अग्रलेख:अंधश्रद्धेच्या सावटाखाली विवेकाचा पराभव
समाजात भोंदू बाबा, तथाकथित गुरू आणि धर्माच्या आड लपलेले ढोंगी यांचे जाळे दिवसें दिवस उघड होत असले, तरी अजूनही अनेक प्रकरणे अंधारातच दडलेली आहेत, ही वस्तुस्थिती अधिक भयावह आहे. अलीकडील घटनांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, अंधश्रद्धा ही केवळ अशिक्षितांपुरती मर्यादित नसून ती समाजाच्या सर्व स्तरांमध्ये खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ गुन्हेगारी म्हणून नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक संकट म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, यात बळी पडणाऱ्यांमध्ये राजकीय नेते, वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेले सुशिक्षित अधिकारी आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही समावेश असल्याची चर्चा आहे. शिक्षणामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, विवेकबुद्धी जागृत होते, अशी आपण सर्वसाधारण समजूत ठेवतो. परंतु या घटनांकडे पाहिले असता ही समजूत खोटी ठरताना दिसते. कारण एका बाजूला स्वतः भोंदू बाबा सुशिक्षित असतो, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या जाळ्यात अडकणारेही सुशिक्षितच असतात. मग प्रश्न निर्माण होतो, शिक्षण नेमके कुठे कमी पडते आहे? शिक्षण केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित राहिले आहे का? की त्यातून मूल्ये, विवेक आणि प्रश्न विचारण्याची क्षमता विकसित होत नाही? जर उच्चशिक्षित लोकही अंधश्रद्धेच्या आहारी जात असतील, तर आपल्या शिक्षणपद्धतीत मूलभूत त्रुटी आहेत, हे स्पष्ट होते. वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ पुस्तकातला विषय न राहता तो जीवनशैलीचा भाग होणे आवश्यक आहे. अन्यथा, पदव्या वाढतील; पण विवेक हरवलेलाच राहील. याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे, अशा भोंदू बाबांना राजकीय पाठींबा मिळत असल्याच्या आरोपांनी परिस्थिती अधिक गंभीर बनते. एकीकडे सरकार अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करते, तर दुसरीकडे सत्ताधारी मंडळीच अशा व्यक्तींना आश्रय देतात, हे अत्यंत विरोधाभासी आणि घातक आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच जर अशा प्रवृत्तीला खतपाणी घातले, तर सामान्य नागरिकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा कसा? राजकारण आणि अंधश्रद्धा यांचे हे धोकादायक संगनमत समाजासाठी विनाशकारी ठरू शकते. कारण यामुळे केवळ गुन्हेगारांना संरक्षण मिळत नाही, तर समाजात चुकीचा संदेशही जातो की प्रभावशाली लोकांच्या छत्राखाली काहीही केले तरी चालते. ही मानसिकता लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांची आणि सामाजिक संस्थांची जबाबदारी अधिक वाढते. अशा प्रकरणांना प्रकाशात आणणे, पीडितांना आवाज देणे आणि समाजात जागृती निर्माण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, केवळ बातम्या दाखवून थांबणे पुरेसे नाही; तर या समस्येच्या मुळाशी जाऊन तिच्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. समाजानेही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपण अजूनही चमत्कारांच्या मोहात अडकून राहणार आहोत का? की विवेक आणि विज्ञानाच्या आधारावर निर्णय घेणार आहोत? श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली, तरी अंधश्रद्धा ही सामाजिक समस्या आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. सरकारने अंधश्रद्धा विरोधी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे, दोषींना कठोर शिक्षा देणे आणि कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाला आळा घालणे आवश्यक आहे. तसेच, शिक्षण व्यवस्थेत वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती आणि नैतिक मूल्ये यांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. शेवटी, ही केवळ एका प्रकरणाची बाब नाही; तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे. जर सुशिक्षित लोकही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत असतील, तर ही इशारा देणारी घंटा आहे. आता तरी समाजाने जागे होऊन विवेकाचा मार्ग स्वीकारला नाही, तर अशा घटना पुन्हा-पुन्हा घडत राहतील आणि त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागेल.

0 टिप्पण्या